नागपूर : आदिवासी विकास विभाग व महाराष्ट्र पोलिसांमार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजनेंतगर्त चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची पहिली सहल महाराष्ट्र दर्शनाला निघाली आहे. या सहलीची सुरुवात नागपूरपासून झाली.
नक्षलग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना राज्यातील औद्योगिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व कृषीविषयक प्रगती यांचे दर्शन घडवून आणणे व त्यांच्या सार्वांगिण व्यक्तिमत्वाचा विकास साधणे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत ही सहल आयोजित करण्यात येते. या अंतर्गत आत्तापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या २२ सहली आयोजित केल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच सहल आहे. नक्षलविरोधी अभियानाचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे व चंद्रपूर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची ही सहल आयोजित करण्यात आली आहे. या सहलीत विविध आश्रमशाळांमधील ४५ मुली व १५ मुले अशा एकूण ६० मुला-मुलींचा समावेश करण्यात आला आहे. यात चंद्रपूरचे पोलीस उपनिरीक्षक धमेंद्र मडावी, महिला पोलीस उपनिरीक्षक ढाले यांच्यासह पोलीस शिपाई, महिला पोलीस शिपाई व आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सहलीला चंद्रापुरातून हिरवा झेंडा दाखविल्यानंतर त्यांचे नागपुरात आगमन झाले. तेथे या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर, दीक्षाभूमी, सुराबर्डी येथील आश्रम यांसह विविध ठिकाणी भेटी दिल्या. पुढे ही सहल नाशिक, मुंबई आदी शहरांना भेटी देऊन त्या ठिकाणची माहिती जाणून घेणार आहे.
या वेळी सहलीत सहभागी झालेले विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ‘यापूर्वी आम्ही कधीही चंद्रपूर जिल्ह्याबाहेर गेलो नाही. आश्रमशाळेतच शिक्षण व राहण्याची सोय असल्यामुळे इतर शहरांशी आमचा कधीही संबंध आला नाही; मात्र महाराष्ट्र दर्शन सहलीच्यानिमित्ताने प्रथमच नागपूर शहर पहायला मिळाले. विमान पाहण्याचा आनंदही वेगळाच होता.’